मुंबई : यशाच्या शिखरावर पोचलेल्या आणि लोकांनी नावाजलेल्या व्यक्तींबाबत जाणून घेण्याची उत्सुकता नेहमीच असते. या व्यक्तीचा जीवनप्रवास, त्यांच्याबद्दल कधी न ऐकलेले किस्से, माहिती आता उलगडणार आहे ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ या नव्या कार्यक्रमातून. ही मालिका ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर २० सप्टेंबरपासून गुरुवार आणि शुक्रवारी रात्री ९.३० वाजता दाखवली जाणार आहे.
प्रत्येकालाच आपल्या लाडक्या आणि नावाजलेल्या व्यक्तींबाबत जाणून घ्यायला खूप आवडते. ही मंडळी त्यांच्या खऱ्या आयुष्यामध्ये कशी आहे, त्यांचे विचार काय आहेत, त्यांचा जीवनप्रवास कसा होता, कसे ते या प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचले, असे बरेच प्रश्न सामान्य माणसांच्या मनामध्ये असतात. या नावाजलेल्या व्यक्तींचे आपण मोठेपण बघितले आहे; पण ते माणूस म्हणून कसे आहेत, त्यांची कधी न पाहिलेली बाजू आणि त्यांच्याबद्दलचे कधी न ऐकलेले किस्से आता प्रेक्षकांना या नव्या मालिकेतून बघायला मिळणार आहेत.
या कार्यक्रमात येणाऱ्या पाहुण्यांबरोबरच यात इरसाल नमुने ही असणार आहेत जे या पाहुण्यांशी गप्पा मारण्याबरोबरच त्यांच्या अतरंगी, खुशखुशीत विनोदशैलीमुळे प्रेक्षकांना दर्जेदार आणि निखळ विनोदाची मेजवानी देखील मिळणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता मकरंद अनासपुरे करणार आहे.
‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांना मराठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्रातील, समाज सेवेमध्ये कार्यरत असलेले, राजकारण, क्रीडा या क्षेत्रातील महाराष्ट्रातील नावाजलेल्या मंडळींसोबत मकरंद अनासपुरे मनमोकळ्या गप्पा मारणार आहेत. किशोर चौघुले, प्राजक्ता हनमघर, भूषण कडू, ओंकार भोजने हे काही इरसाल पात्र या कार्यक्रमाची रंगत अजूनच वाढवणार आहेत. कार्यक्रमामध्ये ‘कलर्स मराठी’वरील लोकप्रिय ‘घाडगे अँड सून’मधील सुकन्या कुलकर्णी आणि अतिशा नाईकतर, ‘राधा प्रेम रंगी रंगली’ मालिकेतील कविता लाड, तसेच ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, उज्ज्वल निकम, भरत जाधव, केदार शिंदे ही मंडळी हजेरी लावणार आहेत. या लोकप्रिय मंडळींची एक दुसरी बाजू प्रेक्षकांना या कार्यक्रमाद्वारे बघण्याची संधी मिळणार आहे.
कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलताना ‘कलर्स मराठी- वायाकॉम १८’ चे व्यवसायप्रमुख निखिल साने म्हणाले, ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने हा खूप वेगळा दृष्टीकोन असलेला कार्यक्रम आहे. प्रत्येक माणसाच्या आयुष्याला विविध पैलू असतात, त्यांचे स्वतंत्र विचार असतात. महाराष्ट्रामध्ये विविध क्षेत्रात नावारूपाला आलेल्या व्यक्तींना आम्ही या कार्यक्रमामध्ये घेऊन येणार असून, यानिमित्त त्यांची एक वेगळी बाजू प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या नावाजलेल्या व्यक्तींना त्यांच्या क्षेत्राव्यतिरिक्त इतर विषयांवर बोलत करण्याची जबाबदारी अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्यावर सोपावली आहे. मला असे वाटते प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या व्यक्तींबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.’
कार्यक्रमाचे सूत्रसंचालक मकरंद अनासपुरे म्हणाले, ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने हा थोडासा वेगळा कार्यक्रम आहे. कारण विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या व्यक्ती या कार्यक्रमामध्ये येणार असून, त्यांच्याविषयी आपल्याला थोडी फार माहिती असते; परंतु या कार्यक्रमामध्ये आपण त्यांच्या अंतरंगाचा शोध घेणार आहोत. त्यांच्या क्षेत्राशी निगडीत नसलेल्या इतर क्षेत्राबद्दल तसेच दुसऱ्या गोष्टींबद्दल त्यांचे मत, त्यांचे विचार हे सगळे विस्ताराने समजून घेण्याचा प्रयत्न आम्ही या कार्यक्रमामध्ये करणार आहोत. थोडे मिश्कील, थोडे गंभीर असा मिश्र स्वरूपाचा हा कार्यक्रम असेल.’